आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक गोष्ट डिजिटल होत असताना कृषी क्षेत्रामध्ये देखील डिजिटल सेवांचा वापर होऊन शेतकऱ्यांना जलदगतीने माहिती,सेवा व योजनांचा लाभ पोहचवण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना सुरू करण्यात आली आहे.ॲग्रीस्टॅक योजना साठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला असून त्याद्वारे शासनाच्या सेवा थेट शेतकऱ्यांपर्यंत त्वरित उपलब्ध करून दिल्या जातील.ॲग्रीस्टॅक योजना मध्ये ज्या शेतकऱ्यांचा 7/12 आपल्या नावाने आहे. त्यांच्या आधार कार्ड क्रमांकाशी शेत जमिनीची माहिती जोडली जाईल.व शेतकरी ओळखपत्र क्रमांक दिला जाईल.यालाच फार्मर आयडी कार्ड, किसान कार्ड, शेतकरी ओळखपत्र असेही म्हणतात.
ॲग्रीस्टॅक योजना उद्देश
ॲग्रीस्टॅक योजना मध्ये सर्व शेतकऱ्यांचा आधार कार्ड चा डाटा व त्याच्या सोबत संलग्न झालेल्या शेत जमिनींचा डाटा, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात लावलेल्या पिकांचा डाटा, भू शास्त्रीय डाटा एकत्र करणे व ते सतत अद्ययावत ठेवून वेगवेगळ्या योजनांचा लाभ पारदर्शकपणे व वेळेवर उपलब्ध करून देणे हा शासनाचा उद्देश आहे. कृषी निविष्ठा खरेदीबाबत तज्ञ लोकांकडून सल्ला व मार्गदर्शन देणे व शेतीशी संबंधित इतर शासकीय विभागांमध्ये समन्वय साधून शेतकऱ्यांना सेवा उपलब्ध करून देणे तसेच कृषी तंत्रज्ञनाचा वापर करून नवनवीन कल्पना राबवणे, यांसारखी कार्ये ॲग्रीस्टॅक योजना मधून पार पाडली जाणार आहेत.
केंद्र शासनाने महाराष्ट्रासोबतच देशातील इतर 24 राज्यांमध्ये ॲग्रीस्टॅक योजना राबवायला सुरुवात केली असून शेतकरी व त्यांच्या शेतजमीनी, वेगवेगळ्या भागात घेतली जाणारी पिके भू शास्त्रीय माहिती यांची माहिती गोळा करून ती सतत अद्ययावत केली जाईल.
शासनाच्या योजनेचा लाभ घेताना लाभार्थ्यांना वारंवार आपली कागदपत्रे पुरवावी लागत होती तसेच KYC आणि प्रमाणीकरण करावे लागत होते.ॲग्रीस्टॅक योजना मुळे वारंवार प्रमाणीकरणाची प्रक्रिया करावी लागणार नाही. शासनाकडे आधीच वेगवेगळ्या यंत्रणेकडून शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध झाल्याने योजना राबविताना सुलभता येणार आहे व लाभार्थ्यांपर्यंत सहजतेने योजनेचा लाभ पोहचवला जाणार आहे.
भारतातील प्रत्येक व्यक्तीला ज्या प्रमाणे आधार क्रमांक चा युनिक आयडी देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आयडी देण्यात येणार आहे. शेतकऱ्याला युनिक आयडी मिळाल्यानंतर त्या आधारे शेतकऱ्याची कोणकोणत्या ठिकाणी शेती आहे. शेतामध्ये कोणत्या पिकांची लागवड केली आहे. याची नोंद घेऊन माहिती गोळा केली जाईल. गोळा केलेला डाटा हा रियल टाईम असल्याने एखाद्या पिकाची शेतकऱ्यांकडून किती प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. हे समजल्याने मागणी व पुरवठा याचा अंदाज लावता येणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या पिकाची जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केल्यास साहजिकच आवक वाढेल व भाव कमी होईल.भाव कमी होईल हे समजल्याने शेतकरी ते पीक टाळून दुसरे पीक घेऊ शकतो.ॲग्रीस्टॅक योजना पोर्टल वरील माहितीच्या आधारे कोणते पीक घ्यायचे कोणते नाही याचा निर्णय शेतकरी घेऊ शकेल.
खालील लिंक वापरुन व CSC ID द्वारा लॉगिन करून फार्मर आयडी काढता येतो. नाव नोंदणीची स्थिती पाहता येते तसेच आता पर्यंत फार्मर आयडी काढलेल्या शेतकऱ्यांची संख्या देखील पाहू शकतो.
ॲग्रीस्टॅक योजना च्या mhfr.agristack.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट दया
ॲग्रीस्टॅक योजना चा फायदा
सध्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढायचा झाल्यास आपले आधारकार्ड, ऑनलाईन 7/12 ची प्रत यांसारखी कागदपत्रे गोळा करण्यासाठी व पिकाची नोंद घेण्यासाठी तलाठी कार्यालय,CSC सेंटर या ठिकाणी जाऊन कागदपत्रे अपलोड करावी लागत आहेत. त्यामध्ये बराच वेळ जातो.फार्मर आयडी काढल्यामुळे शेतकऱ्याची माहिती, त्याच्या शेत जमिनीची माहिती व त्याने लागवड केलेल्या पिकाच्या माहितीचा डाटा अगोदरच उपलब्ध असल्याने पीक विमा एका क्लिक वर निघणार आहे. तसेच आधार कार्ड DBT खात्याशी लिंक असल्याने विम्याची रक्कम आपोआपच भरली जाईल.
शेतकऱ्यांना आपली शेतीची कामे करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते. पीक कर्जासाठी बँकेकडे वारंवार चकरा माराव्या लागतात. आपली कागदपत्रे गोळा करून कर्जाच्या मागणीसाठी बँकेला विनंती करावी लागते. बँकेकडून कागदपत्रांची छाननी केली जाते. एखादे कागद राहून गेल्यास त्याची पूर्तता करावी लागते. बँकेला देखील कर्ज देण्यापूर्वी खात्री करावी लागते की लाभार्थी कर्जासाठी पात्र आहे की नाही. फार्मर आयडीचा वापर करून बँकेला शेतकऱ्याची माहिती जलद गतीने मिळाल्यामुळे शेतकरी कर्जासाठी पात्र असल्यास त्वरित कर्ज वितरण करता येईल.

आपल्या शेतात पिकविलेल्या शेतमालाला योग्य तो बाजारभाव मिळवण्यासाठी शेतकरी सतत प्रयत्नशील असतो. शेतामध्ये केलेला भरमसाठ खर्च निघून थोडे फार पैसे हातात शिल्लक राहावे. अशी त्याची अपेक्षा असते. सरकारने ठरवलेला हमी भाव देणारी खरेदी केंद्रे कोणकोणत्या ठिकाणी आहेत.तसेच कोणत्या बाजारपेठेत काय भाव चालू आहे. एखाद्या मालाची बाजारपेठेमध्ये किती आवक झाली, यांसारखी माहिती शेतकऱ्याला ॲग्रीस्टॅक योजना प्रकल्पातून चुटकी सरशी मिळाल्याने शेतमाल विक्रीसाठी योग्य बाजारपेठ निवडण्याचा निर्णय शेतकरी घेऊ शकतो आणि आपला माल योग्य भावात विकू शकतो. किमान आधारभूत किंमत मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून देखील शेतकरी आपल्या शेत मालाची विक्री करू शकतो.
अतिवृष्टी, पुर, दुष्काळ, वादळी वारे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. सरकारकडून नुकसान भरपाई देखील दिली जाते. परंतु नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे, सर्वेक्षण करणे यामध्ये बराच वेळ जातो. तसेच नुकसान भरपाई मिळताना अडचणी येतात. सरकारी कार्यालयांमध्ये अनेक चकरा माराव्या लागतात.त्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांपर्यंत लगेच पोहचवण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना खूप फायदेशीर ठरणार आहे.
शेतकऱ्यांना शेती अवजारे, स्प्रे पंप, खते, बियाणे, पाईप संच, ठिबक संच, सौर पंप, शेडनेट, कांदा चाळ, पॅक हाऊस यांसारख्या साधनांच्या खरेदीवर शासनाकडून अनुदान दिले जाते. त्यासाठी महाडीबीटी सारख्या योजना राबविल्या जातात.ॲग्रीस्टॅक योजना मुळे अनुदानासाठी पात्र लाभार्थींची निवड करून त्यांच्या आधारलिंक असलेल्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करताना सुलभता येणार असून अनुदान निधी वितरणाची प्रक्रिया जलद गतीने होणार आहे.
केंद्र सरकार कडून राबविली जाणारी पीएम किसान सन्मान निधी योजना ज्यामध्ये ठराविक महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर ठराविक रक्कम जमा केली जाते, यामध्ये देखील ॲग्रीस्टॅक योजना मुळे सुलभता येऊन योजना राबविण्यासाठी मदत होणार आहे.
शेती करत असताना वेळ,श्रम,पैसा यांचा उपयोग कमी करून जास्त उत्पादन मिळवणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करताना डाटा खूप महत्त्वाचा आहे.ॲग्रीस्टॅक योजना पोर्टल वर गोळा केलेल्या माहितीचा वापर करून आधुनिक शेती केल्यास उत्पन्नामध्ये वाढ होईल व वेळ, श्रम व पैसा यांची बचत होईल.ॲग्रीस्टॅक योजना मधून कृषी विभागाद्वारे आधुनिक शेती करण्यासाठी आवश्यक सल्ला व मार्गदर्शन मिळेल. हवामानाची माहिती मिळेल, जवळच्या बाजारपेठेतील बाजारभाव समजतील, विक्री व्यवस्थापन सोपे होईल, माती परीक्षण केल्याने मातीतील अन्नद्रव्यांची आवश्यकता लक्षात येईल आणि खते व औषधांचा योग्य व संतुलित वापराबाबतचे मार्गदर्शन मिळेल, पिकांवरील कीड,रोग यांची माहिती व त्यावरील उपाययोजनांची माहिती मिळेल.सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून पाण्याची बचत होईल.
शेती संबंधित कार्ये पार पाडताना ॲग्रीस्टॅक योजना खूपच प्रभावी ठरणार असून आधुनिक शेती करत असताना शेती साधनांचा अधिक कार्यक्षमपणे वापर करणे फायदेशीर ठरणार आहे. तसेच ॲग्रीस्टॅक योजना राबवताना शासन व शेतकरी यांच्या मधील अंतर कमी होऊन सुसूत्रता निर्माण होईल व शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने फायदा पोहोचवता येईल.ॲग्रीस्टॅक योजना मुळे आधुनिक तंत्रज्ञान द्वारे स्मार्टशेती करणे शक्य होणार असून शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

कोणत्या कृषी यंत्राची किंमत किती व त्यावर किती अनुदान मिळते ते पहा क्लिक करा.
ॲग्रीस्टॅक योजना मधून फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे –
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- 8 अ दाखला
- आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक
ॲग्रीस्टॅक योजना मध्ये नोंदणी करण्यासाठी खालील ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह शेतकऱ्याने स्वतः उपस्थित राहायचे आहे.
- ग्रामपंचायत कार्यालय
- आपले सरकार सेवा केंद्र
- CSC सेंटर
- तलाठी कार्यालय