या लेखामध्ये महाऊर्जा कुसुम योजना मधून शेतकऱ्यांना आपल्या शेतात दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी बसवले जाणारे सौर कृषी पंप याची माहिती देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य हे भारतामधील कृषीक्षेत्रातील एक महत्त्वाचे राज्य आहे. या कृषिप्रधान राज्याचे राष्ट्रीय कृषी सकल उत्पादनात महत्वाचे योगदान आहे. राज्यातील प्रमुख पिकांमध्ये अन्नधान्य पिके, डाळवर्गीय पिके, कापूस, ऊस व तेलबिया यांसारख्या नगदी पिकांचा समावेश होतो. पिकांच्या सिंचनासाठी राज्यातील शेतीचा मोठा भाग पावसावर अवलंबून आहे. दुष्काळ व अनियमित पावसामुळे सिंचनाचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. त्यासाठी जमीनितील पाण्याचा उपसा करावा लागतो. शासनाच्या नियमाप्रमाणे जमिनीतील पाणी पातळीनुसार विहीर, बोअरवेल, शेततळे, नदी यांसारख्या जलस्त्रोतांमधून डिझेल पंप किंवा वीज पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जातो.
डिझेल पंप, वीज पंपाचा वापर करताना मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर केला जातो. इंधनाचे साठे मर्यादित आहेत. तसेच डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे डिझेल पंप वापरणे खर्चिक होत चालले आहे.व पर्यावरणीय दृष्ट्या डिझेलचा वापर हानिकारक आहे. त्याच प्रमाणे वीज पंप वापरताना राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी 24 तास वीज पुरवठा करणे शक्य होत नाही.
विजेचा तुटवडा निर्माण होऊन विजेच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात. तसेच पाण्याच्या सिंचनासाठी रात्री अपरात्री अंधारात शेतावर जावे लागते. साप,विंचू,बिबट्या यांसारख्या जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यांसारख्या अडचणींमुळे दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी महाऊर्जा कुसुम योजना यासारख्या योजने मधून सौर कृषी पंपाचा सिंचनासाठी वापर करणे आवश्यक झाले आहे. महाऊर्जा कुसुम योजना, अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजना शासनामार्फत राबविल्या जातात. सिंचनासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन सौर कृषी पंपाचा वापर करणे शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.
सौर कृषी पंपाबाबत शासनाचे उद्दिष्ट
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्रालयामार्फत 2019 मध्ये पीएम कुसूम योजना जाहीर करण्यात आली.व सुरुवातीला 100000 सौर कृषी पंप बसवण्यासाठी मान्यता देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सौर कृषी पंप महाऊर्जा कुसुम योजना मधून शेतकऱ्यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारकडून महाऊर्जा कुसुम योजना राबवण्यासाठी 2021 मध्ये शासन निर्णय निर्गमित केला. आणि दरवर्षी 100000 सौर कृषी पंप देण्याचे निश्चित करण्यात आले.व पुढील 5 वर्षांमध्ये 5 लाख सौर कृषी पंप वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले.
5 लाख रुपयांच्या सिंचन विहीर योजनेच्या माहितीसाठी क्लिक करा.
सौर कृषी पंपाचे फायदे
- सौर कृषी पंप शेतामध्ये बसवल्याने दिवसा सिंचन करणे शक्य होते. त्यामुळे रात्री अपरात्री पाणी सोडण्याच्या त्रासापासून सुटका मिळते.
- ज्या ठिकाणी अद्याप वीज पोहोचली नाही अशा दुर्गम भागामध्ये शेतीचे सिंचन करणे शक्य होते.
- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतात पाण्याची खूप आवश्यकता असते. उन्हाळ्यात सौर पंप पूर्ण क्षमतेने चालल्यामुळे जास्त वीज निर्मिती होऊन पाण्याचा जास्तीत जास्त उपसा करणे शक्य होते.
- एकदा सौर पंप बसवल्यानंतर त्याच्या देखभाल व दुरुस्ती शिवाय इतर खर्च होत नाही व लाईट बील भरावे लागत नाही.
- वेळोवेळी सौर पॅनेलची व पंपाची साफसफाई आणि देखभाल केल्यास जास्तीत जास्त 20 वर्षांपर्यंत आपण शाश्वत असणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर सिंचनासाठी करू शकतो.
महाऊर्जा कुसुम योजना साठी पात्रता
- ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे सर्व शेतकरी महाऊर्जा कुसुम योजना साठी पात्र राहतील.
- शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी, विहीर, बोअरवेल वैयक्तिक शेततळे, सामुदायिक शेततळे तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारी शेतजमीन असलेले शेतकरी महाऊर्जा कुसुम योजना तून सौर कृषी पंप मिळण्यास पात्र असतील.
- अटल सौर कृषी पंप योजनेतील टप्पा 1 व 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून अर्ज केलेले परंतु सौर कृषी पंप वाटप न झालेले अर्जदार या योजने अंतर्गत पात्र राहतील.
- ज्या शेतकऱ्यांच्या शेताच्या गट नंबर मध्ये पारंपारिक पद्धतीने वीज जोडणी झालेली नाही,HVDS अंतर्गत जोडणी झालेली नाही तसेच त्या गट नंबरमध्ये यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना 1 व 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनांचा लाभ घेतलेला नसेल तर असे शेतकरी महाऊर्जा कुसुम योजना साठी पात्र राहतील.
- सौर पंप बसविण्यास इच्छूक शेतकऱ्याकडे 2.5 एकर पर्यंत शेतजमीन आहे त्यांना 3 HP क्षमते पर्यंत, 2.51 ते 5 एकर पर्यंत शेतजमीन आहे त्यांना 5 HP क्षमते पर्यंत आणि ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांना 7.5 HP क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल.
- पारंपारिक वीज जोडणी न झालेले शेतकरी, विजेसाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी तसेच उच्चदाब वीज वाहिनी पासून कृषी पंपाचे अंतर 600 मीटरपेक्षा जास्त असल्यास अशा कृषीपंप अर्जदारांना पारेषण विरहीत सौर कृषीपंपा द्वारे वीज जोडणी देण्यात येईल.
- राज्य शासनाच्या धडक सिंचन योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने महाऊर्जा कुसुम योजना चा लाभ दिला जाईल.

सौर कृषी पंपाची अंदाजित किंमत व लाभार्थी हिस्सा
महाऊर्जा कुसुम योजना मध्ये सौर कृषी पंपाचा लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांनी 10 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या अर्जदारांना 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
3 HP क्षमतेच्या सौर कृषी पंपाची अंदाजित किंमत 193803 इतकी आहे, सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी हिस्सा 19380 तर अनुसूचित जाती व अनसूचित जमाती लाभार्थी हिस्सा 9690 इतका आहे.
5 HP क्षमतेच्या सौर कृषी पंपाची अंदाजित किंमत 269746 इतकी आहे, सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी हिस्सा 26975 तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती लाभार्थी हिस्सा 13488 इतका आहे.
7.5 HP क्षमतेच्या सौर कृषी पंपाची अंदाजित किंमत 374402 इतकी आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी हिस्सा 37440 तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती लाभार्थी हिस्सा 18720 इतका आहे.
वरील किंमती व लाभार्थी हिस्सा सरकारी धोरणानुसार कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे अधिक माहिती मिळवून योग्य तो निर्णय घ्यावा.
सौर कृषी पंपसाठी लागणारी कागदपत्रे
महाऊर्जा कुसुम योजना साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. त्यासाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे लागतील. ही कागदपत्रे महाऊर्जा च्या वेबपोर्टलवर अपलोड करावयाची आहेत.
- 7/12 उतारा ( 7/12 वर विहीर किंवा बोअरवेलची नोंद केलेली असावी ) 7/12 सामाईक असल्यास इतर हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र.
- आधारकार्ड
- बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जातीचा दाखला ( अर्जदार हा अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास )
- विहीर, पाण्याचा पंप, शेतजमीन सामाईक असल्यास इतर भागिदारांचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

सौर ऊर्जा कृषी पंपासाठी अर्ज प्रक्रिया
महाऊर्जा कुसुम योजना द्वारे सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.त्यासाठी महाऊर्जेच्या/मेडाच्या वेबसाईट वर जाण्यासाठी पुढील लिंकचा वापर करावा.
- सर्वप्रथम मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडून आपली वैयक्तिक आणि शेत जमिनीची माहिती भरावी.
- युजरनेम आणि पासवर्ड चा वापर करून लॉगिन करावे. लॉगिन करण्यासाठी OTP चा पर्यायही वापरता येईल.
- अर्जामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती, शेत जमिनीची माहिती भरावी, तसेच घराचा पत्ता, विहीर/बोअरवेल सारख्या जलस्त्रोताची माहिती, सिंचनाची माहिती, पिकांची माहिती, बँकेची माहिती आणि आवश्यक असणाऱ्या पंपाची माहिती भरावी लागेल.
- अर्जदाराने ऑनलाईन अर्ज केल्यानंतर वेब पोर्टलवर कोटेशन उपलब्ध होईल. त्यामध्ये पंपासाठी किती रक्कम भरावी लागेल. याची माहिती दिली जाईल, तसेच SMS द्वाराही माहिती देण्यात येईल.
सौर ऊर्जा कृषी पंपासाठी लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया
महाऊर्जा कुसुम योजना मधून सौर कृषी पंपासाठी लाभार्थी हिस्सा भरताना पुढील माध्यमांचा वापर करता येईल.
- महाऊर्जेच्या / मेडाच्या वेबपोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने
- महाऊर्जेच्या / मेडाच्या नावे धनाकर्षाद्वारे ( धनाकर्ष वेबपोर्टलवर अपलोड करायचा आहे.)
- महाऊर्जेच्या / मेडाच्या नावे बँकेमध्ये चलन भरून ( चलन पावती वेबपोर्टलवर अपलोड करावयाची आहे.)
कोटेशन मधील माहितीनुसार अर्जदाराने ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर सौर कृषी पंप बसवणाऱ्या पुरवठादाराची निवड करण्यासाठी पर्याय उपलब्ध केला जाईल. व लाभार्थीने पुरवठादाराची निवड केल्यानंतर सर्वसाधारणपणे पुढील 90 दिवसांच्या कालावधीमध्ये पंप देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
ॲग्रीस्टॅक योजना व शेतकरी ओळखपत्राचा फायदा जाणून घ्या क्लिक करा.
नियम व अटी
अटल सौर कृषी पंप योजना 1 व 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा जर या आधी लाभ घेतला असेल तर असे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र असणार नाहीत व दुसऱ्यांदा कुसुम योजनेतून लाभ घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यां विरुद्ध शासनाकडून कार्यवाही केली जाईल.
शेतकऱ्यांकडे योजनेचा लाभ घेण्यासाठी बोअरवेल, विहीर, नदी यांचा शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे. याची खात्री महाऊर्जा कडून केली जाईल. तसेच पाणी जिरवण्यासाठी केलेल्या जलसंधारणाच्या कामाच्या ठिकाणी हा पंप वापरता येणार नाही.